पक्ष्यांसाठी ‘यमदूत’ ठरणारा मांजा करण्यात आला नष्ट…
खामगाव:गेल्या दोन ते अडीच महिन्यांपासून अनिकट परिसरात पक्ष्यांसाठी जीवघेणे ठरलेले मांजाचे ‘डेथ ट्रॅप’ हटवण्याची महत्त्वपूर्ण मोहीम नुकतीच यशस्वीरित्या संपन्न झाली. सुमारे ४ ते ५ चौरस किलोमीटर परिसरातील झाडे, झुडुपे आणि विजेच्या तारांवर अडकलेला हजारो मीटर्सचा मांजा काढून या परिसराला पक्ष्यांसाठी सुरक्षित करण्यात आले आहे.प्रा.राजेश पाटील आणि प्रा. सतीश भावसार यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम राबवण्यात आली. विशेष म्हणजे या मोहिमेत केवळ पर्यावरणप्रेमीच नव्हे,तर परिसरातील गुरे चारणारे, शेळ्या पाळणारे बांधव आणि ‘शिक्षण कट्ट्या’च्या सदस्यांनीही हिरीरीने सहभाग नोंदवला.

शेती, पायवाटा आणि उंच झाडांवर अडकलेले मांजाचे शेकडो गुंते या टीमने जिवाची पर्वा न करता काढून नष्ट केले.दशकापूर्वी केवळ दोघांनी सुरू केलेला हा छोटासा उपक्रम आज एका मोठ्या चळवळीचे रूप धारण करत आहे. या मोहिमेच्या सांगतेच्या वेळी ज्येष्ठ सदस्य वाघ सर यांच्या हस्ते जप्त केलेल्या मांज्याची होळी पेटवण्यात आली. या यशावर भाष्य करताना प्रा.पाटील यांनी मजरूह सुलतानपुरी यांचा एक प्रसिद्ध शेर उद्धृत केला:”मै अकेला ही चला था जानिब-ए-मंजिल मगर,लोग साथ आते गये और कारवा बनता गया!”पक्षांसाठी जीवघेणा ठरतोय मांजा पतंगबाजीसाठी वापरला जाणारा नायलॉन किंवा काचयुक्त मांजा झाडांवर वर्षानुवर्षे अडकून राहतो. यात अडकून दरवर्षी शेकडो पक्षी आपला जीव गमावतात किंवा कायमचे जायबंदी होतात. ही बाब लक्षात घेऊन या टीमने राबवलेल्या सातत्यपूर्ण उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

