बुलडाणा : जिल्ह्यातील मोठा प्रकल्प असलेला खकडपूर्णा नदीवरील खडकपूर्णा प्रकल्प 70.12 टक्के भरला असून नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाच्यावतीने देण्यात आला आहे. या प्रकल्पाचा प्रकल्पीय संचयीत साठा 93.40 दलघमी आहे व पूर्ण संचय पातळी 520.50 मीटर आहे. प्रकल्पात सद्यस्थितीत 519.50 मीटर जलाशय पातळी असून 65.49 दलघमी पाणीसाठा आहे.
प्रकल्पाच्या उर्ध्व भागात गत काही दिवसांपासून जोरदार पाऊस पडत आहे. त्यामुळे धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील पावसाच्या पाण्याचा विसर्ग धरणात येत आहे. प्रकल्पातील पाण्याची आवक वाढली तर कोणत्याही क्षणी पूर नियंत्रणासाठी धरणाचे दरवाजे उघडावे लागणार आहे. त्यामुळे खडकपूर्णा नदीला पूर येण्याची शक्यता नाकारता येत नाही. नदीकाठावरील गावांपैकी दे. राजा तालुक्यातील निमगांव गुरू, सावंगी टेकाळे, डिग्रस बु, डिग्रस खु, टाकरखेड वायाळ, टाकरखेड भागिले, सिंदखेड राजा तालुक्यातील निमगांव वायाळ, साठेगांव, हिवरखेड, राहेरी खु, तडेगांव, राहेरी बु, ताडशिवणी, देवखेड, पिंपळगांव कुंडा, लिंगा आणि लोणार तालुक्यातील खापरखेडा, रायगांव व सावरगांव तेली गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे, असे उपविभागीय अभियंता, खडकपूर्णा प्रकल्प व्यवस्थापन उपविभाग, दे. मही यांनी कळविले आहे.