खामगांव : शहापूर येथील पांदण रस्त्यावर अवकळा आली आहे. शिवाय नदीवर पूल नसल्याने शेतकरी पाण्यातून वाट काढून शेतात जातात. परिणामी, त्यांना त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे आजही शहापूर येथील शेतकऱ्यांना यातना सहन कराव्या लागत आहेत. या गावाजवळ असलेल्या तोरणा नदीवर पुल बांधण्यात यावा या करिता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्ह्याध्यक्ष श्याम अवथळे यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकारी व शेतकऱ्यांनी तोरणा नदिमधे बसून अर्धनग्न आंदोलन करण्यात आले.यावेळी सरकार विरोधी घोषणा सुद्धा देण्यात आले. शहापूर,खेटरी, शिरपूर, पिंपळखुटा, चांगेफळ,चतारी, चांदणी या बुलढाणा व अकोला जिल्ह्यातील शेता साठी व गावासाठी गेल्या 2006 पासून रस्ता नसल्याच्या कारणामुळे हजारो एकर शेतीचे नुकसान होत आहे. मजुराला व गावकरी लोकांना जाण्यासाठी रस्ता नाही याकरिता वारंवार गावाच्या वतीने निवेदन व ग्रामपंचायत च्या वतीने ठराव देऊन सुद्धा अद्याप पर्यंत मागणी पूर्ण झाली नाही शहापुर हे मुख्य व्यवसाय शेती असलेले गाव आहे.

येथील २०० ते ३०० शेतकऱ्यांची शेती नदीच्या दुसऱ्या बाजूच्या शिवारात आहे. शेतात जायचे असल्यास एका अरूंद पांदण रस्त्याने जावे लागते.गावातुन जाताच मोठी नदी आहे. या नदीवर रपटाही बांधण्यात आलेला नाही. यामुळे अनेक वर्षांपासून शेतकऱ्यांना शेतात जाताना कंबरभर पाण्यातून जीव मुठीत घेऊन जावे लागते. ही नदी पार करताना महिलांना तर तारेवरची कसरत करावी लागते. यात अपघातही होऊ शकतो याबाबत ग्रामस्थांनी २००७ पासून अनेकदा ग्रा.पं.मध्ये ठराव घेऊन लेखी प्रस्ताव शासनाकडे पाठविला पण या समस्येला शासनाने केराची टोपली दाखविली.जो पर्यंत आमच्या मागण्या पुर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही नदितून उठणार नाही असा पवित्रा स्वाभिमानी शेतकरी संघटना व शेतकऱ्यांनी घेतला होता.या आंदोलनाची दखल घेत नायब तहसीलदार ह्यानी शासनाकडे प्रस्ताव पाठवून तात्काळ मागणी पुर्ण करण्यासाठी पाठपुरावा करुन लवकरात लवकर पुल बांधण्यात येईल असे लेखी आश्वासन दिले