लासुरा:- पिठोरी अमावस्या हा श्रावणातला शेवटचा सण. त्यालाच सर्जा-राजाचा सण म्हणजेच ‘पोळा’ म्हटलं जात. हा सण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा महत्वाचा सण आहे. या दिवशी बैलांचा थाट असतो. त्यांचाकडून कोणत्याच प्रकारची कामं करून घेतली जात नाही आज लासुरा येथील माना च्या गुढी ची परंपरा ही शेषराव पाटील जवंजाळ यांच्या कडे आहे.
साज शृंगार ते पूजा…या दिवशी आपला बैल सगळ्यात जास्त उठून दिसावा म्हणून शेतकरी आपल्या ऐपतीप्रमाणे बैलांसाठी शृंगार खरेदी करतो. पोळ्याच्या दिवशी सकाळी सर्व प्रथम बैलांना नदी किंवा तळ्याच्याकाठी नेऊन आंघोळ घातली जाते. त्यांना शाल झालरींनी सजवले जाते, त्यांच्या शिंगांना रंगवले जाते. गळ्यात हार, डोक्याला बाशिंग, पायात चांदीचे व करदोड्याचे तोडे, नवी वेसण, नवे कासार घातले जातात. शेतकऱ्यांची बायको बैलांची पूजा करते. या दिवशी घराघरांमध्ये पुरण पोळी, करंजी व ५ भाज्यांची भाजी केली जाते. संध्याकाळच्या वेळी सर्व बैलांना एकत्र आणले जाते. सजवलेल्या बैलांची ढोल ताशांच्या गजरात वाजतगाजत मिरवणूक काढली जाते. यातील वयस्कर बैलाच्या शिंगांना आंब्याच्या दोरांनी मखर बांधण्याची परंपरा आहे. या वेळेस झडत्या (पोळ्याची गाणी) म्हणायची पद्धत आहे. नंतर सर्व बैल ओळीने उभे केले जातात. यांचा क्रम त्यांच्या मालकाच्या गावातील स्थानाप्रमाणे असते.कृतज्ञता व्यक्त करणारा सण…पोळ्याच्या या सणाला ‘बैलपोळा’ असे ही म्हटलं जातं. हा सण म्हणजे बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा सण आहे. बळीराजा या सणाची वर्षभर आतुरतेने वाट पाहात असतो.