खामगाव : शहरांमध्ये स्वच्छतेचा बोजवारा उडाला असून अस्वच्छता, दुर्गंधी व डासांमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. नगरपरिषदेच्या जवळ उभे असलेले फळ विक्रेते तसेच जुन्या नगर परिषदेच्या इमारतीच्या बाजूला चहा विक्रेते मोठ्या प्रमाणात कचरा फेकत असून नगरपालिकेच्या आरोग्य विभागाचे याकडे दुर्लक्ष होतं आहे. शहरातील अनेक ठिकाणी कचरा व पाण्याचे डबके साचल्यामुळे नगरपालिका प्रशासनाचा स्वच्छतेचा दावा फोल ठरला असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे. अनेक भागात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग साचले दिसत आहेत. काही भागांमध्ये घाण पाण्याचे डबके साचले आहेत, दिवसेंदिवस यामध्ये वाढ होत असून खामगाव नगरपालिकेकडून कचरा उचलण्याचासाठीचा मनमानी कारभार सुरू असल्याचे दिसून येत आहे.

चिखलमय रस्ता,घाणीच्या दुर्गंधीने सामान्य नागरिकांना मोठी कसरत करावी लागत आहे.मोठा गाजावाजा करत स्वच्छतेची मोहीम राबवणाऱ्या खामगाव नगरपालिकेचे शहरातील अनेक भागातील अस्वच्छतेमुळे पितळ उघडे पडले आहे.घाणीचे साम्राज्य निर्माण झाल्याने ठिकाणी डबके साचल्याने डेंगू,मलेरिया व साथीचे आजार अधिक वाढण्याची शक्यता आहे. अनेक भागातील नागरिकांनी साचलेल्या डबके या कचऱ्याच्या स्वच्छतेसाठी नगरपालिकेच्या आरोग्य विभागात निवेदनाद्वारे मागणी केली होती. मात्र अद्यापही कुठलेही ठोस पाऊल उचलण्यात आले नाही. स्थानिक नागरिकांनी नगरसेवकांची भेट घेऊन सदर प्रश्न सांगितला असता आज करतो उद्या करतो असे उत्तर देऊन आपली जबाबदारी झटकली असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. शहरांमध्ये अनेक ठिकाणी साथीचे आजार पसरत आहे एकीकडे शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव सुद्धा दिवसेंदिवस वाढताना दिसून येतो आहे.नागरिकांच्या आरोग्याकडे नगरपालिका व स्थानिक नगरसेवक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. नगरपालिकेने तात्काळ या गोष्टीची दखल घेऊन शहरातील अनेक भागातील स्वच्छता करावी अन्यथा डेंगू मलेरिया व साथींचे आजार पसरण्यास वेळ लागणार नाही.
