आपल्या देशामध्ये २५ जानेवारी हा दिवस राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून प्रति वर्षी साजरा करण्यात येतो. भारत निवडणूक आयोगाची स्थापना २५ जानेवारी १९५० या दिवशी झाल्याने हा दिवस राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून साजरा केला जातो. २५ जानेवारी २०११ रोजी पहिला राष्ट्रीय मतदार दिवस साजरा करण्यात आला. ज्याप्रमाणे २६ जानेवारी प्रजासत्ताक दिन, १५ ऑगस्ट हा दिवस स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करतो. यामागे त्या त्या दिवशी त्या त्या घटनेची आठवण जागृत राहावी व त्याची प्रेरणा घ्यावी असा हेतू असतो. त्याप्रमाणे मतदारांमध्ये जागृती निर्माण व्हावी हा मतदार दिन साजरा करण्यामागे मुख्य हेतू आहे.तरुण वर्ग हा देशाचा आधारस्तंभ आहे. जगामध्ये सर्वात जास्त तरुण वर्ग म्हणून चीननंतर भारत दोन नंबरवर आहे. त्यामुळे तरुणांनी अधिक पुढे येऊन, मतदान प्रक्रियेत सहभागी व्हावे व समृद्ध सशक्त अशा लोकशाहीचा पाया अधिक मजबूत करावा अशी अपेक्षा आहे. मानवी जीवन अधिकाधिक सुसह्य करण्यासाठी, शास्रज्ञ मंडळी अहोरात्र मेहनत घेऊन विविध क्षेत्रात संशोधन करीत असतात. निसर्गाच्या प्रतिकूल परिस्थितीशी झगडत देशाच्या सीमारेषेवर आपले सैनिक डोळ्यात तेल घालून प्रसंगी प्राणाची बाजी लावून देशाचे संरक्षण करीत असतात. विविध उद्योगांना चालना देऊन अनेक उद्योगपती देशाच्या विकासामध्ये हातभार लावत असतात. तसेच काळ्या आईच्या सेवेमध्ये आपला घाम गाळून बळीराजा देशाला सुजलाम सुफलाम करीत असतो. आपापले कर्तव्य चोखपणे पार पाडून ही सर्व मंडळी आपआपल्या परीने देशसेवाच करीत आहेत. त्याप्रमाणे मतदान प्रक्रियेत सहभागी होऊन आपले कर्तव्य पार पाडणे ही देखल एक प्रकारची देशसेवाच आहे.
Attachments area
previous post